Monday, February 28, 2011

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी"

आज मराठी भाषा दिवस. तसे वर्षभरात आपण बरेच दिवस साजरे करत असतो. होळी, दिवाळी, ख्रिसमस, ईद सारखे सण. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन, तसेच आजकालच्या तरुणाईचे आवडते वॅलेंटाइन डे, रोझ डे, फ़्रेंडशिप डे, मदर्स डे, फादर्स डे आणि असेच अनेक. हे सगळे दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. वैयक्तिकरित्या एकमेकांना शुभेच्छा, भेटवस्तु देऊन, किंवा सार्वजनिक पातळीवर उत्सव साजरा करुन.

पण माझी थोडी संभ्रमवस्था झाली आहे, की मुळत: मराठी भाषा दिवस साजरा करण्यामागे हेतु काय आहे? साजरा करायचा म्हणजे नक्की काय करायचं? व्याख्यानं, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा वगैरे आयोजित करुन सार्वजनिक पातळीवर साजरा केला जाउ शकतो, माझी खात्री आहे काही सामाजिक संस्था किंवा राजकारणी मंडळी अशा पद्ध्तीने साजरा करतही असतील. पण आपण वैयक्तिक पातळीवर कसे योगदान करु शकतो?

मुळातच हा दिवस साजरा करण्याचा हेतू आधी स्पष्ट व्हायला हवा. मराठी आपली मातृभाषा आहे, पण खरचं तिची जपणुक आपण करतो आहोत का? नविन पिढी तर पुर्णपणे इंग्रजाळत चालली आहे. मान्य की इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा, पुढे जायचं असेल तर इंग्रजी यायलाच हवी. पण म्हणुन या अट्टहासापायी आपण आपल्या मायमराठी पासुन दुर जाण्याची गरज काय?
कवी सुरेश भटांनी म्हटल्याप्रमाणे "आपुल्या घरात हाल सोसते मराठी.." अशी वेळ आली आहे मराठी भाषेवर.

माझ्या मते कोणतिही भाषा ही तिच्या साहित्याने ओळखली जाते. आपल्या मराठी भाषेला तर साहित्याचा वैभवशाली इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामींपासुन ते वि.स.खाडेकर, वि.वा.शिरवाडकर, पु.ल., प्र.के., व.पु... आज मराठी दिवस साजरा करताना मला असं वाटतय की या निमित्ताने आपल्यापैकी प्रत्येकाने जर एक मराठी पुस्तक खरेदी करायचं ठरवलं (वाचण्यासाठी,.. दिखाव्यासाठी नाही!!) ते पण मोलाचं योगदान ठरेल. कोणि आपल्या प्रियजनांना भेट म्हणुन पण पुस्तकं देउ शकतो. घरापसुन जवळ जर एखादं ग्रंथालय असेल तर तिथलं सदस्यत्व घ्यायचं ठरवा. मुलांमधे लहानपणापासुनच वाचनाची गोडी लागेल या द्रुष्टीने प्रयत्न करावा.

खरच मराठी भाषा जपायची असेल आणि वाढवायची असेल तर त्यासाठी आजच प्रयत्न करायला हवेत, आजच्या तरूण पिढीला याची जाणिव करुन देणं खुप गरजेचं आहे. चला, आपण सगळे मिळुन आपला खारीचा वाटा उचलुयात!!! काय मग, होणार ना सहभागी?

"लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी"
(कवी सुरेश भट)

"जय महाराष्ट्र"

---
विक्रम काटे.
२७ फेब्रुवारी २०११